कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
कोल्हापूरातील नष्टे लॉन येथे राज्यस्तरीय तेली समाजाचा मेळावा रविवार दि २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विजयजी वडेट्टीवार, माजी खासदार रामदास तडस आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मेळावा दुपारी बारा ते पाच यावेळेत होणार आहे., अशी माहिती शिवसेना शिंदे गट सांगली जिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभाचे उपाध्यक्ष संजय विभुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संजय विभुते म्हणाले, या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाचे लक्ष प्रमुख १२ प्रलंबित मागण्यांकडे वेधण्यात येणार आहे. तसेच या मेळाव्यात प्रलंबित मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे. महाराष्ट्रातील तेली समाज हा राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारा समाज आहे. संत जगनाडे महाराज, संत संताजी यांसारख्या महान संतांच्या विचारांचा वारसा जपत समाजाने पारंपरिक व्यवसायाबरोबरच शिक्षण, उद्योग, शेती, व्यापार, प्रशासन आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. मात्र, आजही समाजासमोर शिक्षण, रोजगार, व्यवसाय, सामाजिक सुविधा, जमिनी, वसतिगृहे, समाजभवन तसेच पारंपरिक तेल व्यवसायासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न आहेत. रविवार दि २३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय तेली समाज महामेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे लक्ष खालील प्रमुख १२ मागण्यांकडे वेधण्यात येत आहे.

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभाचे युवा उपाध्यक्ष निलेश संकपाळ, युवा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र संदीप मुंडेकर, विभागीय उपाध्यक्ष राजाभाऊ लोखंडे, कोल्हापूर शहर समिती अध्यक्ष उदय करपे, कोल्हापूर शहर समितीचे पदाधिकारी पूनम सांगावकर, विद्या बनछोडे, महानंदा कागले, गीता कागले, अर्चना कागले, तृप्ती सांगावकर, करुणा माळकर, वरदा माळकर, वंदना बंबलवाड, नंदा निर्वाणी, प्रियांका सांगावकर, सुवर्णा झगडे, सुरेश मांजरेकर, सत्यजित सांगावकर, संजय माळकर, विश्वनाथ माळकर, नंदकुमार तेली, प्रभाकर सांगावकर, गणेश बनछोडे, शिवमुर्ती झगडे, मयुर सांगावकर आदींसह सभासद, महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
————————————————
– महाराष्ट्रातील तेली समाजाच्या विविध प्रलंबित अशा आहेत मागण्या
१. संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळास स्वतंत्र महामंडळाचा दर्जा द्यावा.
२. मंगळवेढा, सोलापूर येथे महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे.
३. मुंबई येथे तेली समाज भवनासाठी पाच एकर जागा मंजूर करावी.
४. पारंपरिक तेल व्यवसाय करणाऱ्या प्रामाणिक व्यावसायिकांना संरक्षण द्यावे.
तसेच महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. तसेच प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांना संरक्षण, ही शासनाची दुहेरी भूमिका असावी.
५. देवस्थानच्या जमिनींबाबत तेली समाजाच्या पारंपरिक हक्कांचे संरक्षण करावे.
६. प्रत्येक जिल्ह्यात तेली समाज भवन व विद्यार्थी वसतिगृह उभारावे
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तेली समाजासाठी समाज भवन उपलब्ध करून द्यावे.
७. लिंगायत तेली समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न तातडीने सोडवावा.
८. तेली समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक सुविधा द्याव्यात.
समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा, कृषी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी विशेष शिष्यवृत्ती व मार्गदर्शन योजना सुरू करावी.
९. युवक-युवतींसाठी कौशल्य व रोजगार प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत.
१०. महिला सक्षमीकरणासाठी स्वतंत्र आर्थिक योजना राबवावी.
११. तेली समाजाची सामाजिक व आर्थिक स्थितीचा स्वतंत्र सर्वेक्षण करावा.
१२. पारंपरिक तेल उद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी विशेष योजना राबवावी. आदी मागण्यांचा समावेश आहे.
—————————————————
Our Visitor
Views Last 30 days : 73
Total views : 548914