कोल्हापूर : ( लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
सत्यशोधक इतिहास परिषदेच्या वतीने राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे पहिले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती निमंत्रक डॉ. कपिल राजहंस व साहित्यिक व विचारवंत डॉ. डी. वाय. जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना साहित्यिक, विचारवंत व संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. डी. वाय. जमादार म्हणाले, साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस हे अध्यक्षस्थानी तर शाहीर दिलीप सावंत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. तर कवी, प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने कवी संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. तसेच संमेलनात अण्णाभाऊंच्या साहित्यातील जाति अंताचा विचार या महत्त्वपूर्ण विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून याच्या अध्यक्षस्थानी डॉ. आलोक जत्राटकर तर डॉ. वैशाली चौगुले, राहल सडोलीकर हे वक्ते अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यामधील सामाजिक समता, जातिअंत, परिवर्तनवादी विचार आणि समकालीन संदर्भ या विषयांवर आपले विचार मांडणार आहेत.
पुढे डॉ. जमादार म्हणाले, चार सत्रात होणाऱ्या संमेलनात डॉ. भारत पाटणकर, प्रा किसनराव कुराडे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी भरत रसाळे, उत्तमदादा कांबळे, डॉ. शोभा चाळके, मदन पवार, डॉ. वसंत भागवत, अॅड. करुणा विमल, सुरेश केसरकर, विद्याधर कांबळे, सुरेश केसरकर, शाहीर दीपक गोठणेकर, डॉ. अमोल महापुरे, संजयकुमार अर्दाळकर, प्रा. दादासाहेब ढेरे, डॉ. मिनल राजहंस, अंतिमा कोल्हापूरकर, निलेश बनसोडे, अमोल कांबळे, गंगाधर म्हमाने, शंकर पुजारी, सुनिल जाधव आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनवादी वारशाचा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे प्रसार व्हावा, त्यांच्या विचारांवर व्यापक चर्चा घडावी आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना बळ मिळावे या उद्देशाने हे पहिले साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सत्यशोधक इतिहास परिषदेच्या वतीने सांगण्यात आली आहे. तरी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा व्यापक विचार मांडण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले असून साहित्यप्रेमी, अभ्यासक, संशोधक, कवी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला मदत पवार, डॉ. वसंत भागवत, अंतिमा कोल्हापूरकर, शंकर पुजारी, सुनिल जाधव आदी उपस्थित होते.
Our Visitor
Views Last 30 days : 83
Total views : 548754